नाशिक प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नाशिक शहरातील महामार्ग बसस्थानकात शिर्डीहुन नाशिकला आलेली ई बस (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आल्यानंतर फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली असता काही वेळाने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात एका महिलेचा बस खाली सापडून मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (२३,रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अंजली या चौकशी कक्षाजवळ ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जून(३०, रा. कोंडीकंडुर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असताना त्यांना बसची जोरदार धडक बसली. यावेळी मुपाल्ला हे थोडक्यात बचावले. त्यांच्या हाताला दुखापत झाली. तर चौकशी खिडकीसमोर माहिती घेण्यास उभे असलेले गोरक्ष मछिंद्र गोसावी (५७, रा. पाथर्डीफाटा ) हे देखील बसच्या धडकेत गंभीर जखमी होऊन ओट्यावर कोसळले. या जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हा अपघात होताच प्रवासी आक्रमक झाले होते.बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र प्रवासासाठी निघालेल्या एक प्रवाशाला थेट मृत्यूला सामोरे जावे लागल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक शहरात बस पार्क करताना चालकाचं नियंत्रण सुटलं स्थानकातच तिघांना चिरडलं ; अपघातात एका महिलेचा मृत्यु

0Share
Leave a reply