Disha Shakti

Uncategorized

भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Spread the love

विशेष प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत आपला राजीनामा दिल्यानंतर आज अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील १३ राज्यांमध्ये आज फेरबदल झाले असून झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहणारे रमेश बैस हे लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणार आहेत.

भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांबाबतच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडले होते. त्यामुळे त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून केली जात होती. राज्यपाल हटवण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठ्या मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं होतं. परिणामी सत्ताधारी भाजपची चांगलीच राजकीय कोंडी झाली होती. तसंच स्वत: कोश्यारी हेदेखील आपल्याला पदमुक्त करण्यात यावं, अशा भावना व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपतींकडून त्रिपुरा आणि झारखंडसारख्या राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अनुभवी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रमेश बैस यांची कारकीर्द

रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला आहे. तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांना नियुक्त करण्यात आलं होतं. त्रिपुरात दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.

बैस यांच्यासमोरील आव्हान

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द प्रचंड वादळी ठरली. महाविकास आघाडीचं सरकार असताना कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या वादग्रस्त पत्राचीही मोठी चर्चा झाली होती. तसंच राज्यपाल नियुक्त आमदारांवरून कोश्यारी यांचे महाविकास आघाडीसोबत प्रचंड मतभेद झाल्याचं समोर आलं होतं. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यातून कोश्यारी यांनी वाद ओढावून घेतला होता. या सगळ्या घडामोडींमुळे भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेला धक्का लावत असल्याचा आरोप होत होता. परिणामी राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपचीही राजकीय कोंडी झाली होती. त्यामुळे कोश्यारी यांची गच्छंती अटळ मानली जात होती. आता त्यांच्या जागी राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रमेश बैस यांच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधकांना सोबत घेत राज्याच्या राजकीय गाडा सुरळीत ठेवण्याचं प्रमुख आव्हान असणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!