प्रतिनिधी / प्रमोद डफळ : (अहमदनगर) दि. 08 मार्च – जनतेला पारदर्शक, गतीमान सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत कायदा व नियमांचा सखोल अभ्यास करून सामान्यांना विहित वेळेत सेवा देण्याच्या सूचना राज्य सेवा हक्क आयोगाचे उपसचिव सुनील जोशी यांनी दिल्या. पारनेर तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. जोशी बोलत होते.
यावेळी तहसीलदार शिवकुमार अवळकंठे, गट विकास अधिकारी किशोर माने, आयोगाचे पी.बी. घोडके उपस्थित होते. श्री. जोशी म्हणाले की, सर्वसामान्यांना ऑनलाईन पद्धतीने सेवा देण्याच्यादृष्टीने अनेक शासकीय विभागांच्या सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सेवा देत असताना किरकोळ त्रुट्यांमुळे नागरिकांना सेवा मिळत नसल्याने नागरिक आयोगाकडे अपील करतात. सामान्य नागरिकांनी मागितलेल्या सेवा नाकारताना तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता होत नसेल तरच सेवा नाकाराव्यात. किरकोळ त्रुटींची जागेवरच पूर्तता करुन अधिकाधिक नागरिकांना सेवा देण्याच्या सुचनाही श्री. जोशी यांनी यावेळी केल्या.
नागरिकांना सेवा देत असताना अवाजवी कागदपत्रांची मागणी करण्यात येऊ नये. आवश्यक कागदपत्रांचीच मागणी करण्यात यावी.सेवा देत असताना नागरिकांची कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचना करत प्रथम व द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यांनी नामंजूर अर्जांचा नियमित आढावा घ्यावा. प्राप्त अर्जांची नोंदवही ठेवावी. अर्जाच्या प्रलंबिततेच्या तपासणीसाठी दैनंदिन डॅशबोर्डची तपासणी करावी. नागरिकांनी सेवा मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज केले असतील तर ते ऑनलाईन करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
आयोगाचे पी.बी. घोडके यांनी कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याबाबत विस्तृतपणे माहिती दिली. बैठकीस तालुकास्तरीय विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पंचायत समिती कार्यालयात घेतला ग्रामसेवकांकडून आढावा
पारनेर पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित ग्रामसेवकांकडून उपसचिव सुनील जोशी यांनी कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील जनतेला सेवा पुरविण्यामध्ये ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळै या कायद्यांतर्गत जनतेला सेवा अधिक सुलभरित्या व जलदगतीने मिळण्यासाठी प्रक्रिया व नियमावली समजून घेत विनाविलंब सेवा पुरविण्याच्या सुचनाही श्री. जोशी यांनी यावेळी केल्या.आपले सरकार सेवा केंद्र व शासकीय कार्यालयांना भेट व पहाणी
सामान्यांना सेवा देणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राला श्री. जोशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पहाणी केली. या सेवा केंद्रातून नागरिकांना सेवा कशा पद्धतीने पुरवल्या जातात, सेवेपोटी योग्य शुल्क आकारण्यात येते काय याबाबत पहाणी करुन केंद्र चालकांच्या अडी-अडचणीही त्यांनी यावेळी समजुन घेतल्या. तसेच विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कार्यालयातून होत असलेल्या कामकाजाची पहाणीही त्यांनी यावेळी केली.
Leave a reply