Disha Shakti

राजकीय

‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल

Spread the love

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे  : दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. देशात सध्या संकट आले असून ते दिल्लीपुरते मर्यादित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रातील जनता अरविंद केजरीवाल यांना साथ देईल, असा शब्द शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिला आहे. त्याचवेळी आपण केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी इतर नेत्यांशीही बोलणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतील बदली-पोस्टिंगच्या केंद्राच्या अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. बुधवारी केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यातच आज गुरुवारी (25 मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर उपस्थित नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले की, आपण सर्व बिगर भाजप पक्षांना एकत्र आणण्यावर भर दिला पाहिजे. सर्व गैर-भाजप पक्षांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे.

लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा असल्याचे शरद पवार म्हणाले.

यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही शरद पवारांचे आभार मानतो. सध्या देशाच्या राजकारणात त्यांचा मान सर्वोच्च आहे. इतर पक्षांनाही एकत्र आणण्याचे आवाहन आम्ही त्यांना करतो.

केजरीवाल म्हणाले की जर हा अध्यादेश राज्यसभेत मंजूर झाला नाही तर 2024 ची सेमीफायनल होईल आणि मोदी सरकार परत येणार नाही. अध्यादेश वापरून निवडून आलेल्या सरकारांना काम करू दिले जात नाही, हे देशासाठी चांगले नसल्याचा हल्लाबोल यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!