नगर प्रतिनिधी /कुणाल चव्हाण : महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक यांनी राज्यातील पोलिस निरीक्षक यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील दोन पोलिस निरीक्षक जिल्ह्याबाहेर बदलून गेले आहेत, तर सहा पोलिस निरीक्षक जिल्ह्यात नव्याने आले आहेत.
पोलिसांच्या बदलीसाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या बदल्या जून महिन्यात झाल्या आहेत. अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी बदलीबाबत आदेश नुकतेच काढले आहेत. अहमदनगर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले व अकोले पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष भोये यांची नाशिक शहर येथे आयुक्तालयात बदली झाली आहे. जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये कार्यरत असणारे पोलिस निरीक्षक सईदखाँ दादाखाँ पठाण यांची महामार्ग सुरक्षा विभागात बदली झाली आहे.
जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या चार पोलिस निरीक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार मागील महिन्यात पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. तसेच दोन पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांची पदे रिक्त होती. त्या रिक्त जागेवर आता नवीन सहा पोलिस निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहे.
पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असणारे हरीश खेडकर यांची अहमदनगर जिल्हा पोलिस दलात बदली झाली आहे. याशिवाय गुन्हे अन्वेषण विभागातून नितीनकुमार चव्हाण, लातूरवरून सोपान शिरसाठ, रायगडवरून प्रदीप देशमुख, कोल्हापूरवरून अशोक भवड, सोलापूर ग्रामीणवरून धनंजय जाधव हे पोलिस निरीक्षक जिल्हा पोलिस दलात आले आहेत.
Leave a reply