Disha Shakti

राजकीय

मंत्रिपदावरून शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये बाचाबाची ; भांडण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री नागपूर दौरा सोडून मुंबईत

Spread the love

प्रतिनिधी / रमेश खेमनर : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये वाद झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिपदावरून ही बाचाबाची झाली आहे. या दोघांच्या भांडणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला नियोजित नागपूर दौरा सोडून आमदारांचे भांडण सोडवण्यासाठी मुंबईत परतावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन होऊन एका वर्षाचा कालावधी लोटला. तरी सुद्धा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून पूर्णपणे पार पडला नाही.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यानंतर अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून बसले आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी आशा असल्याने शिंदे गट आणि भाजपमधील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री झाली.

राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. उर्वरीत आपली वर्णी लागावी यासाठी शिंदे गटातील आमदारांतच चुरस निर्माण झाली आहे. काही आमदारांनी ‘गेले वर्षभर ज्यांना मंत्रिपद उपभोगता आले, त्यांना हटवून इतरांना संधी द्या’ अशी जाहीर मागणी केली आहे. अशातच मंत्रिपदावर दावा करणाऱ्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका टोकाला गेला की उभयंतांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!