प्रतिनिधी / जितू शिंदे : सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण 10 फेब्रुवारी पासून सुरु असून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलेला असून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
सर्व सामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळकाढूपणा करत आहे. जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल, याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी, असे या निवेदनात म्हटलेले आहे .नगर जिल्ह्यातील सर्व समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून, त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून नगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे असे या निवेदनात म्हटले आहे. ‘ सगे सोयरे ‘ शब्दासहित सरकारने अध्यादेश काढला मात्र कायद्यात तो परावर्तित झालेला नाही म्हणून हे उपोषण सुरू करण्यात आलेले आहे.
Leave a reply