राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. परंतु आता विशेष अधिवेशनाच्या कालावधीवरून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार या विषयावर खरचं गंभीर आहे का? असा सवाल करत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.
‘मनापासून अधिवेशन घ्यायची सरकारची इच्छा असेल, तर किमान तीन दिवस तरी अधिवेशन घ्यावे. उगाच नौटंकी नको. या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल व साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे’, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारच्या विशेष अधिवेशनाबाबत ट्विटरवरून आपले मत व्यक्त करत सरकारला सुनावले.
’20 तारखेला मराठा आरक्षण प्रश्नावर एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात येत आहे. एका दिवसात किती आमदार आपलं मत व्यक्त करू शकणार आहेत? पुढच्या रांगेत बसणारे सात ते आठ लोकं निम्मा दिवस घेणार. बाकीच्यांना अध्यक्ष दोन मिनिटात बेल मारणार.’ असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत मराठा आरक्षणा प्रश्नी आमदारांना आपले मत व्यक्त करण्यासाठी वेळच मिळणार नाही, अशी भीती देखील तनपूरे यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे संबंधित राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.
मराठा आरक्षणाबाबत एक दिवस नव्हे तीन दिवसांचे अधिवेशन घ्या, उगाच नौटंकी नको – आमदार प्राजक्त तनपुरे

0Share
Leave a reply